एक लक्ष्यभेद...
आजपासून ९ वर्षांपूर्वी २०१२ साली एक कुटुंब जोधपूर, राजस्थान इकडे आपल्या कारमधून निघालं होतं. त्यात १० वर्षांची एक मुलगी जोधपूरला आपण जातो आहोत म्हणून अतिशय आनंदात होती. तिच्या शाळेचा नृत्याचा एक कार्यक्रम होता, ज्यात तिने भाग घेतला होता. लहानपणापासून संगीताच्या तालावर तिचे पाय थिरकत होते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या कुटुंबासमोर ते थिरकणार म्हणून ती खूप आनंदात होती. गाडीत तिचे आई, बाबा, भाऊ आणि चुलत भावंडंही होती. प्रवासात त्याच नृत्याची स्वप्नं बघता बघता तिचा डोळा लागला. अचानक त्या स्वप्नातून ती काहीतरी आदळण्याने अर्धवट जागी झाली. तिला काही कळेपर्यंत गाडी रस्त्यावरून २-३ वेळा उलटी पलटी होऊन बाजूच्या शेतात घुसली होती. ती भानावर आली तोवर त्या कोवळ्या मुलीला काय घडलं आहे याचा अंदाज येत नव्हता. तिच्या पाठीतून कळा येत होत्या. तिने पाय हलवण्याचा प्रयत्न केला पण ती हलवू शकली नाही. आपले संगीताच्या तालावर थिरकणारे पाय आज तिला सापडत नव्हते. हे एक वाईट स्वप्न आहे असा विचार ती करायला लागली. हॉस्पिटलमध्ये जाताना कदाचित काही वेळाने आपण स्वतः उठून उभं राहू असंच तिला वाटत होतं.
दिवसांमागून दिवस गेले, महिने गेले पण तिचे पाय कायमचे हरवले. सहा महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर तिला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली पण ती आता स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती. एकेकाळी नाचण्याचे स्वप्न बघून जोधपूरला जाणारी ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती हा धक्का तिच्यासाठी खूप मोठा होता. या घटनेने त्या १० वर्षांच्या चिमुरडीचं आयुष्य संपूर्णपणे बदलून गेलं होतं. सगळ्यात रमणारी, हसणारी ती आता सर्वांपासून लांब झाली. गप्प राहयला लागली. तिचं संपूर्ण विश्व कुठेतरी उध्वस्त झालं होतं. तिच्या वडिलांनी तिला मित्र-मैत्रिणी बनवण्याचा सल्ला दिला. पुन्हा एकदा मोकळ्या आकाशाशी नातं जोडायला सांगितलं पण हे सगळं स्वीकारणं तिच्यासाठी खूप कठीण होतं.
२०१५ साली ९वीच्या सुट्टीमध्ये तिच्या वडिलांनी तिचं मन बाहेरच्या जगात गुंतवण्यासाठी धनुर्विद्या या खेळाशी ओळख करून दिली. पण तिला हे शिवधनुष्य पेलणं जमलं नाही. मग त्यांनी तिला शूटिंग रेंजवर नेलं. तिची ओळख बंदुकीशी करून दिली. ती साधारण ५ किलोची बंदूक उचलून १० मीटरवर निशाणा लावणं तिला जड गेलं, पण तिने आयुष्यात पहिल्यांदा फायर केलेले १० च्या १० शॉट समोरच्या काळ्या वर्तुळात लागले होते. तिकडेच त्या मुलीला आपलं लक्ष्य सापडलं होतं. त्या लक्ष्याला तिने आजच्या ३० ऑगस्ट २०२१ या दिवशी वयाच्या फक्त १९ व्या वर्षी पॅराऑलिम्पिक स्पर्धेत जागतिक विक्रमाशी बरोबरी करत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान मिळवताना पूर्ण केलं आहे. ती आहे भारताची पॅरा नेमबाज 'अवनी लेखरा'.
२०१२ साली झालेल्या घटनेने अवनीचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. तिची ओळख अश्या एका आयुष्याशी झाली ज्याची कधी तिने कल्पना केली नव्हती. हे नवीन आयुष्य स्वीकारणं तिला खूप कठीण गेलं. अगदी बसण्यापासून ते रोजच्या रोज सगळी कार्यं करताना तिला आयुष्याची परीक्षा द्यावी लागत होती. हे सोप्पं नव्हतं. तिच्या मते आपण दिव्यांग झालो आहोत हे स्वीकारणं सगळ्यात मोठी गोष्ट होती. आपल्या बाजूचं जे जग बदललेलं आहे ते एकदा का स्वीकारलं की पुढचा प्रवास काय असणार आहे याची कल्पना येऊन त्यावर मार्गक्रमण करणं हा भाग सोपा होता. २०१५ ला शूटिंग रेंजवर नेमबाजी करणं एक टाईमपास म्हणून तिने स्वीकारलं होतं. पण तिचे वडील नेमबाजी या खेळासाठी गंभीर होते. त्यांनी तिला भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राचं आत्मचरित्र आणून दिलं. ते वाचल्यानंतर अवनीच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. ज्या पद्धतीने त्याने भारतासाठी पहिलं ऑलिम्पिकमधलं सुवर्णपदक जिंकलं तसा सन्मान मिळवण्याचं ध्येय तिने निश्चित केलं.
आधी शाळेतून तर नंतर राज्यस्तरीय स्पर्धेतून तिने आपल्या नेमबाजीची झलक दाखवायला सुरूवात केली. काही स्पर्धेंत धडधाकट असणाऱ्या स्पर्धकांना मागे टाकत अवनीने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. बंदुकीची नेमबाजी हा खेळ तसा खर्चिक आहे. अवनी आत्तापर्यंत बंदुकी आणि लागणारं साहित्य हे दुसऱ्याचं वापरत होती. शालेय किंवा राज्यस्तरीय ज्युनिअर पातळीवर त्याने काम भागत होतं पण ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च महाग होता. २०२१ साली होणाऱ्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या तयारीसाठी भारत सरकारच्या 'स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया'ने Target Olympic Podium Scheme (TOPS) ची योजना काही वर्षं आधी आणली होती. अवनीने भारत सरकारकडे मदत मागितली. त्यानंतर अवनीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं साहित्य या योजनेखाली उपलब्ध करून देण्यात आलं. पण ही सुरूवात होती, तिला अनेक अडथळ्यांवर मात करायची होती. तिच्या मते,
“I believe it is harder for us because we have to have mental strength. When you are a para-athlete, people start judging you. To live with a disability is a victory in itself.”
दिव्यांग म्हणून समाजाची बघण्याची मानसिकता वेगळी झालेली असते. स्वतःच्या आयुष्याशी झगडणाऱ्या त्या खेळाडूला खेळाशिवाय या अडथळ्यांवर मात करून आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध करायचं असतं. आज अवनी लेखराने त्या सगळ्या अडथळ्यांवर मात करत लक्ष्यभेद करताना आपलं नाव खेळाच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरताना भारताची महिला ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवण्याचा मान पटकावला आहे. तिचा हा प्रवास राखेतून उडी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखा आहे. जो अनेक भारतीय खेळाडूंना तर प्रेरणादायक आहेच पण आयुष्यात छोट्या छोट्या अपयशांनी खचून जाणाऱ्या प्रत्येकाला अपयशावर कश्या रीतीने मात करता येऊ शकते हे दाखवणारा आहे.
अवनी लेखराचं तिच्या उत्तुंग यशासाठी खूप खूप अभिनंदन. आज प्रत्येक भारतीयाला मग तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू दे, तुझा अभिमान आहे. तुझ्या पुढील प्रवासासाठी सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल